नवी दिल्ली – म्यानमारमधील लष्कराच्या बंडाच्या पार्श्वभुमीवर यांगून येथील भारतीय दूतावासाने म्यानमारमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी व अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिकांसाठी भारताच्या दूतावासाने आज एक मार्गदर्शिका जारी केली आहे. त्यामध्ये ही सूचना दिली गेली आहे.
म्यानमारमधील लष्कराने सोमवारी बंड करून राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेतली आहे. देशातील सर्व प्रमुख राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी, नेते, लेखक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त आणि देशाच्या सर्वोच्च नेत्या आंग सान स्यू की यांचाही समावेश आहे. स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या सत्तारुढ पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले गेले आहे.
या पार्श्वभुमीवर म्यानमारमधील अलीकडील घडामोडी लक्षात घेता सर्व भारतीय नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व अनावश्यक प्रवास करणे टाळले पाहिजे, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. म्यानमारमध्ये सुमारे सात हजार अनिवासी भारतीय राहत आहेत तर 15 ते 25 लाख भारतीय वंशाचे नागरिक म्यानमारमध्ये रहात आहेत, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
भारतीय नागरिकांनी आवश्यकता भासल्यास भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावे, असेही दूतावासाच्या सूचनेमध्ये म्हटले आहे. म्यानमारमधील राजकीय घडामोडींबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तेथील कायद्याची अंमलबजावणी आणि लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, असे भारताने म्हटले आहे. म्यानमारमधील सर्व घडामोडींवर बारकाईन लक्ष ठेवले जात असल्याचेही भारताने म्हटले आहे.
अनेक दशकांच्या लष्करी राजवटीनंतर 2011 मध्ये म्यानमारमध्ये लोकशाही स्थापन झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत स्यू की यांच्या “नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ पक्षाने निर्विवाद विजय मिळवला होता. मात्र या निवडणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप लष्कराने केला होता.