लखनौ – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉग मधील लिखाणातून मोदी सरकारची वास्तवताच निदर्शनाला आणून दिली आहे अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. भाजपने विरोधकांना कधीही राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले नव्हते असे आडवाणी यांनी आपल्या ब्लॉग मध्ये नमूद केले आहे त्या अनुषंगाने त्यांनी ही टीका केली आहे.
भाजपच्या स्थापना दिनाच्या निमीत्ताने आडवाणी यांनी एक प्रकारे मोदींच्या कार्यपद्धतीवर अविश्वासच व्यक्त केला आहे असे मायावती यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे. हे जनविरोधी सरकार पुन्हा सत्तेवर येण्याच्या लायकीचे नाही असेच बहुधा आडवाणी यांना म्हणायचे असावे अशी शेरेबाजीही त्यांनी केली आहे.