दुष्काळग्रस्तांसाठी हेल्पलाइन 1077 – टोल फ्री, 020-26123371
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता गंभीर होत आहे. दुष्काळ व पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील चारा छावण्यांना 24 तासांत मंजुरी देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरिता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी येणाऱ्या तक्रारींकरिता स्वतंत्रपणे नोंद घेतली जात आहे.
जिल्ह्यातील बारामती, शिरूर, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव, दौंड तालुक्यासह इतर ठिकाणी 203 पेक्षा अधिक टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चाऱ्याचीही तीव्र टंचाई असून, त्यासाठी बारामती तालुक्यात चार तर शिरूरमध्ये दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी छावणी व पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची गरज आहे, त्याठिकाणी तत्काळ सुरू केले जात आहेत.
जिल्ह्यात कुठेही पाणी व चारा टंचाई निर्माण झाल्यास तसेच दुष्काळासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आले आहे. तसेच 1077 या टोल फ्री व -020-26123371 या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.