नांदेड – पुण्यातील एका दाम्पत्याने मुलीच्या लग्नातला अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा संकल्प केला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांना घर बांधून देण्यात येत आहे.
पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेतली जाते. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्नात अवाजवी होणारा खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला निवारा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांना घर बांधून दिले जात आहे. सध्या घराचे बांधकाम अंतीम टप्यात आहे.
लक्ष्मी साखरे यांचे शेतकरी पती राजेश साखरे यांनी तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दरम्यान घराचे स्वप्न साकार होत असल्याने साखरे कुटुंबाने डाॅ. मिलिंद भोई यांचे आभार व्यक्त केले आहेत.
शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपल्या अन्नदात्याविषयी कृतज्ञता ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अतिवृष्टी, नापिकीमुळे, कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी कुटुंबात अडचणी येतात. अडचणीत सापडलेला शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येवू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. एका सामाजिक जाणीवेतून हा संकल्प केला. तो पूर्ण होत आहे. विवाह सोहळ्यात आहेर न देता शैक्षणिक साहित्य द्यावे, अशा भावना डॉ मिलिंद भोई यांनी व्यक्त केल्या आहेत.