जळोची – बारामती तालुक्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. बाधित रुग्णांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत चा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. शासनाच्या मदतीपासून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश ढवाण, माजी आरोग्य सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपाययोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत वाटप केलेले अन्नधान्य व यापुढील नियोजनाची माहिती दिली. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.