आरोग्य यंत्रणेची दमछाक : हायरिस्कच्या व्यक्तींविषयी आवश्यक काळजीचा अभाव
पिंपरी – गेल्या वर्षभरापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. आजपर्यंत इतक्या जणांना करोनाची लागण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून शहरातील बाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दररोज दोन हजाराहून अधिक रुग्ण शहरामध्ये सापडत आहेत. मात्र, वर्षानंतरही करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यात पालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
सातत्याने करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर वेळच्या वेळी केले तर बऱ्याच अंशी करोनाला आटोक्यात आणणे शक्य होईल.करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी महापालिकेची रुग्णालये व तपासणी केंद्रावर चाचणी केली जाते. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे चाचण्या केल्या जात आहेत. मागील वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यामध्ये शहरातील बाधितांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे शहरातील नागरिकांसह पालिका प्रशासनालाही दिलासा मिळाला होता. मात्र फेब्रुवारी अखेर पुन्हा शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. दररोज दोन हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे.
आतापर्यंत शहारातील 1 लाख 63 हजार 128 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तसेच 3004 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोना बाधितांची संख्या वाढत असताना वर्षभरानंतरही पालिका प्रशासनाच्या ढिसाळ काराभाराचा फटका बसत आहे. त्याला अपुरे मनुष्यबळ व वर्षभरात आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण हे कारण असले तरी करोना काळात या बाबींकडे दर्लक्ष केल्यानेच करोना वाढला असल्याची चर्चा आहे.
करोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने होत असतो. यासाठी अमंलबजावणी यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक आहे. ज्या भागात बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्या भागातील मनपा दवाखान्यामार्फत त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे. हायरिस्क रुग्णांशी संवाद साधणे, त्यांना स्वॅब देण्यासाठी पाठविणे. त्यांना मनपा दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक आहे मात्र याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.
बाधित आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात नाही. एक नागरिक दिवसभरात कुटुंबातील सदस्य, कार्यालयातील स्टाफ, मित्र, नातेवाईक अशा अनेकांच्या संपर्कात येत असतो. मात्र, तो पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेतला जात नाही. परिणामी दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
रुग्णांबाबत प्रशासन बेफिकिर
शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ज्या रुग्णांची घरी सोय आहे अशा रुग्णांना घरी आयसोलेट केले जात आहे. या रुग्णांना 18 दिवस सक्तीने एकाच खोलीत रहावे लागत आहे. या रुग्णांचा खोलीचा दरवाजा सील करावा. त्यांच्या घराला याविषयीचे फलक लावावे. यासह अन्य महत्वाचे निर्देश आहेत. मात्र अशा संक्रमित व्यक्तिंच्या घराला फलक लावले जात नाही. त्यामुळे रुग्णांविषयी परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत. होम विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यापासून करोनाचा संसर्ग वाढत आहे.
तपासणी पथकांबाबत साशंकता
करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथके नेमली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात. मात्र यापैकी किती पथके कार्यान्वित आहेत याबाबत साशंकता आहे.