सातारा -करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अति-तातडीचे काम असेल तरच जिल्हा परिषदेत अभ्यागतांना प्रवेश द्यावा. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाच्या आवाहनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशभरासह राज्यातही करोना संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
सातारा जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 13 मार्चपासून लागू केला आहे. शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, मॉल्स, बाग बगीचे, उद्याने, क्रीडा संकुले बंद करण्यात आले आहेत. संसर्गाने करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषद व त्या अखत्यारित येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या आहेत.
जिल्हा परिषदेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून होणारी गर्दी टाळण्यासठी दि. 31 मार्चपर्यंत अतितातडीचे काम असेल तरच अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हास्तर व क्षेत्रीय स्तरावर सर्वसामान्य जनतेने शासकीय कार्यालयात न जाता मेलद्वारे अर्ज करुन माहिती प्राप्त करुन घ्यावी.
संबंधित विभागाने सामान्य जनतेसाठी आपल्या कार्यालयातील इमेल आयडी व फोन नंबर उपलब्ध करुन द्यावेत. सातारा जिल्हा परिषद कार्यालयासाठी करोना कालावधीसाठी पत्रव्यवहार करण्यासाठी लशिूींऽसारळश्र.लो/ऊूलशेसरवीीींऽसारळश्र.लो या इमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संजय भागवत यांनी केले आहे.
क्षेत्रीय स्तरावर अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे इमेलद्वारे पाठवण्यात यावेत. सर्वसामान्य जनतेकडून इमेलद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जावर नियमानुसार विहित मुदतीत उचित कार्यवाही करुन संबंधित विभागाने अर्जदारांना माहिती कळवावी. सर्व विभागांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉशचा वापर करण्यात यावा. आपले कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. वैयक्तिक सुनावणीस एखादी व्यक्ती गैरहजर राहिली म्हणून प्रकरणे, केस निकाली न काढता वैयक्तिक हजेरीमध्ये सूट देवून त्यास पुढील तारीख द्यावी, अशा सूचना संजय भागवत यांनी केल्या आहेत.