नवी दिल्ली- संसदेच्या दोन्ही सभागृहात राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवर भाजप सदस्यांनी आजही जोरदार गदारोळ केला. तर त्याचवेळी मोदींच्या वक्तव्यांवरूनही सरकारवर निशाणा साधत अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीच्या मागणीवर विरोधकही ठाम राहिले. त्यामुळे आज लागोपाठ दुसऱ्यादिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणतेही कामकाज न होता तहकुब करावे लागले.
या प्रकरणी कॉंग्रेसने सरकारवर आरोप करताना म्हटले आहे की, अदानींच्या गैरव्यवहार प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी आम्हाला संसदेत मांडू दिली जात नाही. त्यासाठीच त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्त्यावरून खोटा कांगावा सुरू केला आहे त्यामुळेच संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे.
भाजपने राहुल गांधींनी माफी मागावी ही मागणी लावून धरली असली तरी तिकडे राहुल गांधी हे अदानी प्रकरणावरून पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा सरकारला या अनुषंगाने काही प्रश्न विचारले आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण केवळ अदानींनाच श्रीमंत करण्यासाठी राबवले जात आहे काय? असा सवाल राहुल गांधींनी सरकारला विचारला आहे. गेल्या नऊ वर्षात मोदींनी भारताला भ्रमात ठेऊन अदानींबरोबर विश्वभ्रमण केले आहे असेही राहुल गांधी यांनी ट्विटरवरील व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी राहुल यांचा दावा खोडनू काढताना म्हटले आहे की चिमणभाई पटेल आणि राजीव गांधी या कॉंग्रेसच्या नेत्यांनीच अदानींना मोठे केले आहे. कॉंग्रेसच्या या आधीच्या दहा वर्षाच्या काळात अनेक घोटाळे झाले परंतु मोदींच्या या काळात घरबांधणी, उज्ज्वला गॅस, शौचालय उभारणी, पाणी पुरवठा अशी मोठी कामे केली आहेत. सरकारला बदनाम करून त्यांना ही कामे उद्धवस्त करायची आहेत असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज सभागृहाच्या बाहेरही जोरदार आवाज उठवला. शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले की अदानी प्रकरणात जेपीसी नेमल्यानंतरच त्यांच्या गैरव्यवहाराचे खरे स्वरूप उघड होईल. सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दमात घेण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. आम आदमी पक्षाचे संजयसिंह म्हणाले की, विरोधकांचे दमन करण्याच्या केंद्र सरकारच्या कामात केंद्रीय यंत्रणा या सरकारच्या भागीदार बनल्या आहेत.