सुनीता शिंदे
कराड – कराडमध्ये भाजपच्या दोन गटांमधील धुसफूस गुरुवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षादेश मानून दोन्ही गटांचे नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले होते; परंतु त्यांच्यात दिलजमाई झाली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक झाली, सत्ता स्थापन झाली. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा सुरू झाले.
कराड पालिकेत डॉ. अतुल भोसले गटाच्या रोहिणी शिंदे या थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या तर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते विक्रम पावसकर यांच्यासह चार नगरसेवक निवडून आले. भाजपला अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर व मिनाज पटवेकर यांनी पाठिंबा दिल्याने पालिकेत भाजपप्रणित सदस्यांची संख्या सहा व एक नगराध्यक्ष अशी झाली. नगराध्यक्ष भाजपच्या असल्या तरी यशवंत, लोकसेवा, जनशक्ती आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष एका पक्षाचा तर बहुमत दुसऱ्याकडे अशी स्थिती असल्याने त्यांचे कितपत जुळेल, अशी शंका सर्वांना होती.
विधानसभा निवडणुकीनंतर पालिकेच्या कामास पुन्हा सुरुवात झाल्यानंतर नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांना त्यांच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळायला हवा होता. मात्र, त्यांचे भाजपच्या इतर सदस्यांशी कधीच पटले नाही. त्यांच्यात नेहमीच कलगीतुरा सुरू आहे. याउलट बहुमत असलेल्या यशवंत, जनशक्ती व लोकसेवा आघाडीच्या सदस्यांनी नगराध्यक्षांना पाठिंबा दिला. अनेक बाबतीत सहकार्य केले. सभेत नगराध्यक्षांवर भाजपचे सदस्य शेरेबाजी करत असताना आघाडीच्या सदस्यांनी मात्र नगराध्यक्षांना पाठिंबा असल्याचे आपल्या कृतीतून एक प्रकारे दर्शविले.
विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ. अतुल भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा पावसकर गटाचे सदस्य फारसे खूष नव्हते. मात्र, पक्षाचा आदेश म्हणून दोन्ही गटांनी एकत्र काम केले.
त्यामुळे त्यांचे जुळले, असेच वाटत होते. निवडणुकीनंतर ते फारसे एकत्र दिसले नाहीत तरी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. त्यामुळे सर्व आलबेल असल्याचे चित्र असताना गुरुवारी झालेल्या पालिकेच्या मासिक सभेत विनायक पावसकर यांनी नगराध्यक्ष सौ. शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. नगराध्यक्षांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले. आपल्या वयाचा मान राखत आहे, याचा अर्थ काहीही बोलणे खपवून घेणार नाही, असे त्यांनी सुनावले. नगराध्यक्ष व पावसकर यांच्यात बराच वेळ खडाजंगी सुरू असल्याने मुख्य विषय बाजूला पडले होते. भरीस भर म्हणून लोकसेवा आघाडीचे नेते व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सवतासुभा मांडल्याने ही सभा चांगलीच गाजली.
लोकप्रतिनिधींच्या अवमानाबाबत तंबी
स्वच्छ सर्वेक्षणच्या कामात मदतीचे कारण देत एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पालिकेत राबता वाढला आहे. त्यांच्याकडून पालिकेच्या कामकाजातही ढवळाढवळ करणे, भांडणे लावण्याचे उद्योग सुरू आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी अशा लोकांना अभय देऊ नये. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करावी. लोकप्रतिनिधींचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी तंबी सर्व नगरसेवकांनी दिली.
टक्केवारीवरून आरोप-प्रत्यारोप
शहरातील कामे ठरावीक ठेकेदारांनाच दिली जात असल्याचा आरोप विनायक पावसकर यांनी केला. या कामांमधून टक्केवारी मिळविण्याचा प्रयत्न पदाधिकारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पदाधिकारी व पावसकर यांच्यात चांगलीच जुंपली होती.
पालिकेच्या पावित्र्याची झाली आठवण
विशेष सभा चार महिन्यानंतर का घेतली या कारणावरून पावसकर व नगराध्यक्ष यांच्यात जुंपली होती. हा वाद काही केल्या शमत नसल्याने बांधकाम समितीचे सभापती हणमंतराव पवार, गटनेते राजेंद्रसिंह यादव, अतुल शिंदे, विजय वाटेगावकर यांनी सभागृहाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन दोघांनाही केले.