मुंबई: मागील एक महिनाभर सुरु असलेलं सत्तानाट्य अखेर थांबले असून, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्री होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात आजचा दिवास सुवर्णक्षराने नोंदवला जाईल. या शपथविधी सोहळ्याचे नेतृत्व युवराज आदित्य करत आहेत, त्याचवेळी ठाकरे कुटुंबाच्या धगधगत्या संघर्षांचे प्रतीक असणाऱ्या राज यांचे चिरंजीव अमित मात्र मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा घेऊन रस्त्यावरील आंदोलनात उतरले आहेत.
महानगरपालिकेतील साडेसहा हजार कंत्राटी कामगारांची 14 महिन्यांची, तर घंटागाडी कामगारांची 43 महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“सीवूड स्टेशन ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत हा थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला आहे. साडे सहा हजार कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहोत. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावे”, असं आवाहन नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले होते.
एकीकडे उद्धव ठाकरेंचा शपथविधी तर दुसरीकडे अमित ठाकरे आपल्या नेतृत्वात पहिल्यांदाच महामोर्चा काढत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.