लखनौ: उत्तर प्रदेशात करोनाच्या साथीला प्रभावीपणे नियंत्रित ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. प्रभावी नियोजनामुळे उत्तर प्रदेशात किमान 85 हजार जणांचा जीव वाचवण्यात आला आहे. 2017 पूर्वी अशा कामगिरीची कल्पनाही करता येऊ शकली नसती, असे पंतप्रधानांनी सांगितले.
रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने औद्योगिक सहभागाने स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी “आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान’चा प्रारंभ आज केला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी करोनाच्या आपत्तीचा उपयोग उद्योगवाढीच्या संधीसारखा केला. 2017 पूर्वीच्या सरकारांनी असे करणे टाळले असते, असे पंतप्रधान म्हणाले.
पूर्वी कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. तेंव्हा अलाहबादचे लोकप्रतिनिधी असलेल्या तत्कालिन पंतप्रधानांनी मृतांची संख्या लपवण्याचाच प्रयत्न केला होता, अशी आठवणही मोदींनी सांगितली.
उत्तर प्रदेशाची लोकसंख्या युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या चार देशांइतकी म्हणजे 24 कोटी आहे. या चार देशांमध्ये मिळून करोना विषाणूमुळे 1.30 लाख मृत्यू झाले आहेत. हे देश विकसित आहेत. तिथे सुविधांची काहीही वानवा नाही. तरिही या देशांमध्ये उत्तर प्रदेशापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. उत्तर प्रदेशातील करोनाच्या बळींची संख्या केवळ 600 इतकीच आहे. उत्तर प्रदेशची ही कामगिरी निश्चितच खूप मोठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अमेरिकेकडेही सर्व सुविधा आहेत. पण तरिही तिथे 1.25 लाख मृत्यू झाले आहेत. आज योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नसते. तर 85 हजार अधिक लोकांचा मृत्यू झाला असता, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी सहा जिल्ह्यातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेकडो श्रमिक रेल्वेतून 30 ते 35 लाख स्थलांतरित मजूर मूळ गावी परतले. आपल्या कामामुळे मुख्यमंत्र्यांनी वडीलांच्या अंत्यसंस्कारांनाही जाणे टाळले. याचे कौतुकही पंतप्रधानांनी केले.
आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान योजनेतून 31 जिल्ह्यांमध्ये 1.25 कोटी रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट आहे. रोजगारासाठी अन्य राज्यात गेलेल्या आणि करोनामुळे उत्तर प्रदेशात परतलेल्या सर्व स्थलांतरित मजूरांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता उत्तर प्रदेशात आहे, असे योगी आदित्यानाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले.