अंबरनाथ : मेट्रोचे अधिकारी आरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अंबरनाथमध्ये जनआशीर्वाद यात्रेसाठी आज आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
सध्या नाणार प्रकल्प आणि मेट्रोतील वृक्षतोडीवरून शिवसेना भाजपात मतभेद सुरू आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे परस्परविरोधी वक्तव्य करत असल्याने युतीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना दोन पक्षात मतभेद असल्याची कबुली आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच नाणारबाबत स्थानिकांच्या भूमिकेला आमचे समर्थन असेल, असे स्पष्ट करतानाच आरेबाबत मात्र मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन खोटं बोलायला लावतात, असा आरोप त्यांनी केला.
मेट्रो-3 प्रकल्पासाठीही 3 हजार झाडे तोडली होती, ती नव्याने लावली. पण आरेमध्ये फक्त झाडंच नव्हे, तर बिबट्या, अजगर आणि इतर अनेक दुर्मिळ प्राणीसंपदा आहे. यामुळे त्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय मी नव्हे, तर जनता घेईल, असे म्हणत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले. मात्र कुठून लढायचं हे निश्चित नसून संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असल्याचे ते म्हणाले.