औरंगाबाद – शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेताहेत. शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. अशात औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांची औरंगाबादच्या बिडकीन गावात सभा होणार आहे. औरंगाबाद पैठण रस्त्यावर असलेल्या या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा पार पडणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंचा या बिडकीन गावात हा तिसरा दौरा आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी त्या गावात ज्याठिकाणी रॅली काढली होती, त्याच ठिकाणी काही दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाली होती.
आणि गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार हल्लाबोल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आजची ही सभा अनेक दृष्ट्या महत्वाची मानली जात असून, अनेकांच्या नजरा आदित्य ठाकरेंच्या भाषणाकडे लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा देखील बिडकीन गावातील दौरा चांगलाच गाजला होता. आता त्याच गावात आज पुन्हा आदित्य ठाकरे येणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरु झाल्याने हा वाद झाला होता. यादरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक ही झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.