मुंबई : राज्याच्या विधिमंडळातील विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यात आले आहे. दरम्यान, या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांना उत्तर देताना, “राज्यात अडीच वर्षे सत्तेची मलई खाण्यात व्यस्त असलेल्यांना त्यावेळी बाळासाहेबांची आठवण झाली नाही. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावू, असे ज्यांना सुचले नाही, त्यांना आता बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे तैलचित्र विधानसभेत लावणाऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही”, असा टोला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.
तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचे तैलचित्र लावले म्हणून त्यांना पोटसूळ उठला आहे, असे सत्तार म्हणाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबतचा निर्णय निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना कार्यकाळ संपल्यामुळे पक्षप्रमुख पदावर राहता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विधानभवनात गद्दारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. सत्तार यांनी गोंदियात एका सामूहिक विवाह समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आले असता या टीकेला प्रत्युत्तर दिले. सत्तेत असताना तुम्हाला बाळासाहेबांची आठवण झाली नाही पण त्यांचे खरे निष्ठावंत अनुयायी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला त्यांचे मी व आमच्या मंत्रिमंडळाने मनापासून स्वागत केले.