नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिपुत्र आदित्य यांनी बुधवारी दिल्ली दौरा करून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. महाराष्ट्रात शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केल्यानंतर राहुल आणि आदित्य यांच्यातील ती पहिलीच भेट ठरली.
राहुल यांची भेट घेण्यासाठी आदित्य त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. सध्याची राजकीय स्थिती, मित्रपक्षांमधील समन्वय, नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तक (एनपीआर) हे मुद्दे चर्चेत उपस्थित झाल्याचे समजते.
आदित्य यांच्याकडे मंत्री म्हणून पर्यावरण आणि पर्यटन या खात्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे पर्यावरण आणि पर्यटनाशी निगडीत मुद्द्यांवरही त्यांच्यात चर्चा झाली. आदित्य यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचीही भेट घेतली.
त्या भेटीत महाराष्ट्रातील सत्तारूढ मित्रपक्षांमधील समन्वय वाढीस लागण्याच्या दृष्टीने उचलल्या जाणाऱ्या पाऊलांवर चर्चा झाली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकतीच विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र, त्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यापार्श्वभूमीवर, राहुल आणि आदित्य यांच्या भेटीला महत्व आहे.