मुंबई- वरळी मतदार संघातून आपण विधानसभा लढवणार असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज जाहीर केले आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. आदित्य यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
दरम्यान, यावेळी खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचं जोरदार कौतुक केलं आहे. “शिवाजी महाराजांचा छावा म्हणजे संभाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या. अगदी तसंच आदित्य ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राचा छावा राजकारणात आला आहे”. असं संजय राऊत यांनी म्हंटल.
आदित्य ठाकरेंना आम्ही लहानपणापासून पहात आलो आहोत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनाही वाटलं असतं की ज्या शिवसेनेच्या स्थापनेसाठी मी 50 वर्षे घालवली त्या शिवसेनेतला हा क्षण पाहून मी धन्य झालो. असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
गेले काही दिवस आदित्य निवडणूक लढतील असे संकेत मिळत होते. मात्र त्याला ठाकरे यांनी दुजोरा दिला नव्हता, मात्र आज त्यांनी स्वत:च ही घोषणा केली आहे.