मुंबई – भाजपचा मुंबईकरांच्या पैशांवर म्हणजेच महापालिकेतील ऐशी हजार कोटींच्या एफडीवर डोळा असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता भाजप नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘तो जनतेचा पैसे आहे’ असे म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे. ठाकरे गटासमोर मुंबईचा गड राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अशात राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर भाजपचे अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. “आदित्यजी… ती तुमची वडिलोपार्जित संपत्ती नाही. तो जनतेचा पैसा आहे आणि जनतेचाच राहील” असं भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे नेमकं
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी भाजपकडे असलेल्या महानगरपालिका तोट्यात असल्याचे विधान केले होते. तसेच भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता हवी आहे कारण भाजपचा मुंबईकरांच्या पैशावर म्हणजेच मुंबई महापालिकेच्या ऐशी हजार कोटींच्या एफडीवर डोळा आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले होते.