कोल्हापूर (प्रतिनिधी) – महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाल आहे त्यामुळे कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकार प्रयत्न करत आहे. देशातील अन्य भागात उद्धभवलेली परिस्थिती पाहता सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती जाहीर होण्याची अपेक्षाही आहे.सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर यावर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळली असून, या जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या भागात शिवसेनेसह इतर संघटनाच्या कडून मदतीचा ओघ सुरु असून, कोल्हापूर पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, कराड आदी भागातील पूरग्रस्त नागरिकांना भेटी देण्याकरिता ते दोन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.
मंगळवारी सकाळी शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य योजनेत सुरु असलेल्या मदत कार्यात ते सहभागी झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज शहरातील बापट कॅम्प येथे पूरग्रस्तांना जिवनावश्यक साहित्याच्या मदतीचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी बापट कॅम्प येथील पूरग्रस्त कुंभार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.यावेळी कुंभार समाजाच्या वतीने माजी महापौर मारुतीराव कातवरे यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्या मांडल्या.
झालेले नुकसान अतिप्रचंड प्रमाणात असून, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, केरळ, आसाम, कर्नाटक या राज्यातही पूरस्थिती गंभीर असल्याने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित होण्याची शक्यता आहे. यामध्ये नागरिकांच्या घरांसह, व्यापारी, शेतकरी बांधवांच्या मालाचे नुकसान झाले आहे. यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी आम्ही केली आहे. हा हवामानातील बदल एक चिंतेची बाब असून, पुढील काळात अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजित उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह इतर पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मागे शिवसेना खंबीर उभी असून, पुन्हा एकदा कोल्हापूरला स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी आरोग्य मंत्री नाम. एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षआमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.