नवी दिल्ली : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2018 मध्ये नोकरी न मिळाल्याच्या रागातून संशयित आदित्य राव याने मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला होता, असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तो बुधवारी पोलिसांपुढे हजर झाला.
अशा स्वरूपाचा गुन्हा ही त्याच्यासाठी नवीन गोष्ट नाही. यापुर्वी त्याने अफवा पसरवाणारे कॉल केले असल्याचे तपासात समोर येत आहे. आदित्या राव हा मणीपालचा रहिवासी असून त्याने अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.
मंगळुरू विमानतळाच्या तिकीट खिडकीपाशी सोमवारी जिवंत बॉम्ब आढळला होता. नंतर त्याला निर्जन ठिकाणी नेऊन निकामी करण्यात आले. राववर बंगळुरूमध्ये अफवा पसरवणारे कॉल आणि चोरी असे चार गुन्हे दाखल आहेत.
रावला 2018मध्ये अटक झाल्यानंतर न्यायलयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान आणि कारागृहात पाठवतानाही भविष्यात आपण हाहाकार माजवणार असल्याचे सांगितले होते, असे बंगळूरमधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
तो नेहमी अफवा पसरवणारे कॉल्स करत असे. पण, बॉम्ब ठेवण्याच्या कृतीकडे तो का वळला हे कोणीच सांगू शकत नाही. त्याला कारागृहातून कधी सोडले ते आपल्याला माहित नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. राव एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होता. काही किरकोळ मतभेदावरून त्याने नोकरी सोडली होती. त्यानंतर त्याने एका महाविद्यालयात सुरक्षा अधिकाऱ्याची नोकरी केली होती.
बंगळुरूमध्ये आल्यावर त्याने विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या पदासाठी अर्ज केला. त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्यावर त्याने गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी दिली होती.