कोलकाता – कॉंग्रेसने पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत इंडियन सेक्युलर फ्रंटशी आघाडी करण्याबद्दल कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी टिका केली होती. त्यामुळे पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी हे शर्मा यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. भाजपच्या अजेंड्याशी मिळतीजुळती भूमिका घेऊन आनंद शर्मा हे पक्षाच्या हिताला बाधा पोहचवत आहेत अशी प्रतिक्रीया चौधरी यांनी दिली आहे.
कॉंग्रेसने पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मौलाना अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन सेक्युलर फ्रंट या राजकीय पक्षाशी आघाडी केली आहे. पण कॉंग्रेसने केलेली ही आघाडी गांधी नेहरूंच्या सेक्युलॅरिझमच्या तत्वात बसणारी नाहीं अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली होती.
जातीयवाद्यांशी लढण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे, त्यात त्यांना विशिष्ट स्वरूपाचा भेदभाव करता येणार नाही असेहीं शर्मा म्हणाले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना चौधरी यांनी म्हटले आहे की आम्ही येथील डाव्या आघाडीशी निवडणूक आघाडी केली आहे. कॉंग्रेसला त्यांच्या वाट्याच्या जागा मिळाल्या आहेत. तथापि डाव्या आघाडीने इंडियन सेक्युलर फ्रंटशी हातमिळवणी केली असून ते त्यांच्या कोट्यातील जागा त्या पक्षाला देणार आहेत. डाव्या आघाडीचा हा निर्णय जातीयवादी आहे असे आनंद शर्मा यांनी म्हणणे म्हणजे भाजपचीच री ओढण्यासारखे आहे असेही चौधरी यांनी आनंद शर्मा यांना सुनावले आहे.