गृहमंत्रालयाने केला खुलासा
नवी दिल्ली – केंद्र सरकारने काश्मीरात दहा हजार जादा सुरक्षा जवान तैनात केले आहेत. त्यावरून विविध शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या विषयी आज खुलासा करताना गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, काश्मीरातील स्थितीचा अंदाज घेऊनच तेथे जादा सैन्य दले तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोटेशनच्या गरजेनुसार अशी तैनाती तेथे नेहमीच केली जाते. त्याविषयी लोकांमध्ये उघड चर्चा केली जात नाही असेही गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय सुरक्षा दलांच्या शंभर कंपन्या (सुमारे दहा हजार जवान) तेथे तैनात केल्याजात असून या तुकड्या लवकरच आपल्या नियोजित जागी पोहचत आहेत असेही या सूत्रांनी सांगितले. तेथे कार्यरत असलेल्या जवानांना सुट्टी देणे., त्यांच्या ऐवजी अन्य जवानांना तैनात करणे, स्थानिक सुरक्षा गरजेनुसार जादा सैन्य दलाची नेमणूक करणे, इत्यादी कारणांसाठी तेथे हे जादा सैन्य पाठवले जात आहे असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.