कुरवली – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज बिले दुरुस्त करून वीज कनेक्शन तात्काळ जोडा, अन्यथा भविष्यात मोठा संघर्ष करावा लागेल. इंदापूर तालुक्याला वेगळा न्याय आणि इतर तालुक्यांना वेगळा हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मानकरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत साठ लाख रुपये विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी छत्रपती सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप, मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास माने, पुणे जिल्हा भाजप सचिव तानाजी थोरात, कर्मयोगी कारखान्याचे संचालक कुबेर पवार, भास्कर गुरगुडे, सतीश व्यवहारे, तसेच तावशी गावचे सरपंच लालासाहेब सपकळ, बालाजी घोलप, मार्केट कमिटीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर, अर्बन बॅंकेचे संचालक विजय पांढरे, उद्धटचे सरपंच रवींद्र यादव, चंद्रकांत सपकळ, पवारवाडीचे माजी उपसरपंच सतीश चव्हाण, बबन वाबळे, थोरातवाडीचे सरपंच अमोल थोरात, शत्रुघ्न घाडगे, इत्यादी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम करत असून हजारो कोटींच्या निधीच्या गप्पा मारताना रस्त्याची कामे मात्र निकृष्ट होत आहेत. याबाबत कोणीच काही बोलत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणतेही प्रकारचे नियोजन नसून तालुक्याची अधोगती होत चाललेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी मतदार भविष्यात त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल तुपे यांनी केले. अविनाश घोलप, तानाजीराव थोरात यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुराव कदम यांनी केले. यावेळी संभाजी कणसे, सुनील आबा चव्हाण, अनिल तुपे, हरिदास यादव, गजानन यादव, सुनील मोरे, राजेंद्र मानकर, तुकाराम पवार, दशरथ मोरे, बापूराव मानकर, रामदास मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आम्ही सत्तेत असताना सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी केला पण सध्याचे लोकप्रतिनिधी मात्र सत्तेचा वापर विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी करत आहेत ही गोष्ट सहन केली जाणार नाही.
– हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री तथा भाजप नेते