मुंबई – येत्या 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायीला मिठी मारण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला असून सरकारने अधिकृत पत्रकाद्वारे तसे आवाहन केले आहे. या उपक्रमाची शिवसेनेच्या ठाकरे गटाने खिल्ली उडवली अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हेच पंतप्रधानांसाठी “पवित्र गाय” असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
भारत सरकारच्या ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या वतीने ही सुचना जारी करण्यात आली आहे. “सकारात्मक उर्जा” पसरवण्यासाठी आणि “सामूहिक आनंद” साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा ‘काउ हग डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन या बोर्डाने केले आहे. या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या योजनची खिल्ली उडवणारे मिम्स सोशल मिडीयावरहीं सुरू झाले आहेत.
या संबंधात शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, लोकांना अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे आहे, परंतु मोदी सरकारने लोकांना शांत ठेवण्यासाठी पुन्हा धर्माचा डोस दिला आहे. मोदी संसदेत अदानीबद्दल बोलले नाहीत, त्यांचे सरकार गायींवर बोलले.
अदानी हा शेअर बाजाराचा मोठा बैल आहे, परंतु मोदींसाठी ती एक पवित्र गाय आहे, असेही या संपादकीयात म्हटले आहे, पंतप्रधानांनी या मोठ्या बैलाला मिठी मारली असून अजून ते ही मिठी सोडण्यास तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुका जेमतेम वर्षभरावर आल्या आहेत. आता लोकांपुढे जाताना या सरकारकडे लोकांना सांगण्यासारखे काहीही नाही त्यामुळे त्यांना असेच गेैरलागू मुद्दे पुढे करावे लागत आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे.