सातारा – अदानी उद्योग समूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणाची आरबीआय, सेबीने चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, केंद्र सरकारने “अदानी एके अदानी’ हा अजेंडा थांबवून आता सर्वसामान्यांसाठी योजना राबवून उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
कॉंग्रेसच्यावतीने जिल्हा कॉंग्रेस भवनात “हात से हात जोडो’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “”केंद्र सरकार उद्योगपतीधार्जिणे असून त्यांचा अदानी एके अदानी अजेंडा सुरु असल्याचे दिसत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) मार्फत अदानींना मोठ्या प्रमाणात विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. अदानी समूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला असल्याने स्टेट बॅंक व एलआयसीमधील सर्वसामान्यांचा पैसा असुरक्षित झाला आहे.
अशी भयानक परिस्थिती असतानाही विविध मार्गाने अदानीला मदत करण्याचा खटाटोप केंद्राकडून सुरु आहे. अदानी समूहाच्या घोटाळ्यामुळे त्यांचे शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले आहेत. जगातील सर्वात मोठा घोटाळा होऊनही अदानी याबाबत बचाव करताना दिसत नाहीत. दुसरीकडे मात्र केंद्रातील मंत्री अदानींच्या बचावासाठी सरसावले आहेत.” केंद्र सरकारने नेहमीच उद्योगपती, व्यापाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे सर्वसामान्य जनता महागाईने मेटाकुटीस आली आहे. उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. अशी भयावह परिस्थिती असतानाही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प फसवा आणि भ्रमनिरास करणारा आहे. उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असतानाही त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे, असी टीका त्यांनी केली.
एसबीआय व एलआयसीसमोर उद्या आंदोलन
अदानी उद्योग समूहास स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्यावतीने (एलआयसी) विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे कर्ज केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन देण्यात आले आहे. सध्या अदानींचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता धूसर आहे. वास्तविक या दोन्ही वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य माणूस गुंतवणूक करत असतो. हा सर्वसामान्यांचा पैसा परत मिळावा यासाठी कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.6) दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडेना
राज्यातील सरकार घटनाबाह्य असून न्यायालयीन लढ्यात हे सरकार कोसळणार आहे. सरकार टिकेल अशी शाश्वती नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लटकला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या उठल्या असल्या तरी अंतर्गत कलह व न्यायालयाचा निकाल यावर हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मिंत्रमंडळाचा विस्तार होणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला