नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकार आपल्या सरकारसाठी लाजीरवाण्या ठरणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर संसदेत चर्चेची मागणी फेटाळत आली आहे, असा आरोप कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी केला. आताही अदानी समूहाच्या शेअर बाजारातील घोटाळ्याच्या संबंधात चर्चा झाली तर सरकारचीच लक्तरे निघणार असल्याने ते या विषयावर संसदेत चर्चा करण्यास अनुमती देत नाहीत, असा आरोप थरूर यांनी केला आहे.
अदानी ग्रुप कंपनीच्या समभागांमध्ये झालेल्या फसवणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी समस्त विरोधी पक्षांनी केली आहे. थरूर म्हणाले की, संसद हे देशासमोरील समस्यांवर चर्चा करण्याचे एकमेव महत्त्वाचे ठिकाण आहे.
आपण निवडून दिलेल्या खासदारांना कोणत्या बाबींची चिंता आहे आणि ते कोणते विषय संसदेत उपस्थित करतात हे लोकांना पहायला मिळते. पण खेदाची गोष्ट आहे की, आमच्या सरकारला याचे महत्त्व वाटत नाही. त्यामुळे ते संसदेत महत्त्वाच्या विषयावर चर्चाच होऊ देत नाहीत. परिणामी, आता आमचे दोन दिवस वाया गेले आहेत.
अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्याचा विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सरकारने त्यावर तातडीने चर्चेला अनुमती दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारला संसदेच्या गेल्या सत्रात चीन सीमा परिस्थितीवर चर्चा व्हावी, असे वाटत नव्हते. बेरोजगारी आणि महागाईवरही चर्चा व्हावी, असे सरकारला वाटत नव्हते. सरकारला लाजीरवाणे ठरतील असे कोणतेच विषय त्यांना चर्चेला घ्यायचे नसतात.