प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमांतून लोकमान्य टिळकांनी येणाऱ्या पुढच्या पिढीशी परंपरेची नाळ जोडण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांना सर्व राष्ट्रपुरुषांची ओळख करून देऊन हे कार्य पुढे नेणे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शिक्षण आहे. टिळक आणि समकालिन नेत्यांनी नेहमी राष्ट्राचा विचार केला. स्वातंत्र्यानंतर देशाची रचना कशी असेल याची स्वप्ने पाहिली. म्हणून ती अंमलात आली. आजच्या पिढीने देश उभारण्याच्या कार्याचा विचार केला पाहिजे. संवेदनशील पिढी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले.
डीईएस पूर्व प्राथमिक शाळेने “शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, नाट्य संस्कार कला अकादमीचे संस्थापक प्रकाश पारखी, डॉ. राहुल देशपांडे आदी उपस्थित होते.
शिक्षणामुळे संपूर्ण जीवनावर संस्कार होतो. स्वातंत्र्याबरोबर संस्कृती आणि समृद्धीसाठी राष्ट्रीय शिक्षण आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. टिळकांचे विचार डीईएस पुढे नेत आहे, असे डॉ. कुंटे म्हणाले. कार्यक्रमात 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिववंदना, 1857 चे स्वातंत्र्य समर, टिळकांचा जन्म, शालेय-महाविद्यालयीन जीवनातील गोष्टी, क्रांतिकारकांना मार्गदर्शन, रॅंडचा वध, न्यू इंग्लिश स्कूल स्थापना, केसरी-मराठा वर्तमानपत्र, गणेशोत्सव-शिवजयंती उत्सवाची सुरूवात, स्वामी विवेकानंदांशी भेट, विदेशी कपड्यांची होळी, लाल-बाल-पाल युग आदी ऐतिहासिक प्रसंग सादर करण्यात आले. अभिषेक खेडकर यांनी निवेदन, मुख्याध्यापिका बर्वे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक, सोनाली साठे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.