आयपीएल स्पर्धा सुरू झाली की, लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करते हेच समीकरण होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेचा टीआरपी काहीसा घसरला आहे. मात्र, तरीही आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी याच स्पर्धेचे व्यसपीठ वापरण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे.
यंदाच्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा सामना सुरू असताना चक्क त्यांचीच जर्सी परिधान करून अभिनेता संजय दत्त व अभिनेत्री रविना टंडन यांनी उपस्थिती लावली व आपल्या केजीएफ-2 या नव्या चित्रपटाचे प्रमोशन केले. म्हणजे आता ही स्पर्धा विविध गोष्टींचे प्रमोशन करण्याचे व्यासपीठ बनली आहे, असे म्हणावे का.
इथे पूर्वी चीअर लीडर्स मुली नृत्य करायच्या. विविध अभिनेते सामने पाहायला अतरंगी कपडे घालून उपस्थित राहतात. त्यांच्या जोडीला विविध संघ विकत घेतलेले अभिनेते व अभिनेत्री आपल्या संघातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी हजेरी लावतात. म्हणजे आता या स्पर्धेत क्रिकेट सोडून बाकी सगळं होत चाललं आहे, असेच म्हणावे लागेल.
खरेतर आयपीएल स्पर्धा देशातील गुणवत्तेला परदेशी गुणवत्तेकडून काहीतरी शिकवण्याचे एक मोठे माध्यम बनली होती. आता ही ओळख कुठेतरी हरवत चालली आहे व एक व्यापार बनली आहे. क्रिकेटचे व्यापारीकरण काय आत्ताच झाले असे नाही तर त्याची सुरुवात आपण 1983 साली पहिला विश्वकरंडक जिंकला तेव्हाच सुरू झाली होती. मात्र, जशा पिढ्या बदलल्या तसे त्याची व्यप्तीही वाढली व निकष बदलले.
मागे एकदा एक अभिनेता म्हणाला होता की, मला माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची गरज नसते, ते काम माझे चाहतेच करतात; मग मी त्यासाठी वेळ आणि पैसा का खर्च करू. आता काळ बदलला आहे. आपले मार्केटिंग आपणच करावे लागते, दुसरा कोणी उभा राहात नाही. आपले दोष काढण्यासाठी जग पुढे येते, पण कौतुकासाठी एकही उभा राहात नाही. हेच महान कार्य बॉलीवूडमध्ये पूर्वापार चालत आहे. पण काहींना या स्पर्धेचा वापर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण्याची मेख जमली आहे.
संजय दत्त व रविना टंडनने बेंगळुरूच्या जर्सीवर केजीएफ-2 या आपल्या नव्या चित्रपटात रंगवलेल्या पात्रांची नावे टाकली व खेळाडूंची भेट नाही घेता आली, तरीही संघ व्यवस्थापनाची भेट घेत फोटोसेशनही केले. या चित्रपटात संजय दत्तने अधिरा हे पात्र रंगवले आहे, तेच नाव त्याने आपल्या जर्सीवर टाकल्याचे फोटोत दिसून आले म्हणजेच आता तोदेखील या चीप प्रसिद्धीसाठी अधीर झाल्याचेच दिसते. असो, कालाय तस्मै नमः