मुंबई – अभिनेते- दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर हे विख्यात अभिनेते, निर्माते राज कपूर यांचे पुत्र आणि ऋषी कपूर यांचे बंधू होते.
ऋषी कपूर यांच्या पत्नी, अभिनेत्री नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. चेंबूर येथील निवासस्थानीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना इंन्लॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रणधीर, ऋषी, राजीव कपूर हे तीन बंधू आणि भगिनी रितू नंदा, रिमा जैन या भावंडांमध्ये राजीव सर्वात धाकटे होते. त्यांचे मोठे बंधू ऋषी कपूर आणि भगिनी रितू नंदा यांचे गेल्याच वर्षी निधन झाले आहे.
राजीव कपूर यांनी 1983 मध्ये “एक जान है हम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र राज कपूर यांनी दिग्दर्शन केलेल्या 1985 मधील “राम तेरी गंगा मैली’ या सुपरहिट चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.
याशिवाय “आसमान’, ‘लव्ह बॉय’, “जबरदस्त’, “जलजला’ आणि ‘हम तो चले परदेस’ आदी चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. “जिम्मेदार’ हा 1990 सालचा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा सिनेमा ठरला. आशुतोष गोवारीकर यांच्या “तुळशीदास ज्युनिअर’ या चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार होते. या सिनेमाची घोषणा गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली होती.
अभिनय थांबवल्यानंतर राजीव कपूर यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. “हीना’ या गाजलेल्या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली होती. 1996 साली राजीव कपूर यांनी “प्रेमग्रंथ’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाद्वारे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. ऋषी कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या 1999 सालच्या “आ अब लौट चलें’ या सिनेमाची निर्मितीही त्यांनी केली होती.