81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाटक, साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांकडून दुःख व्यक्त
कर्नाटक सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
बेंगळूरु- प्रसिद्ध नाटककार, अभिनेते आणि ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक डॉ. गिरीश कर्नार्ड यांचे आज सकाळी राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सरस्वती, पुत्र रघु कर्नार्ड, लेखिका-पत्रकार कन्या राधा असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि साहित्य, नाट्य, सिनेक्षेत्रातील मान्यवरांनी गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कर्नाटक सरकारने कर्नाड यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सकाळी 8 वाजता कर्नाड यांचे निधन झाले. त्यांना गेल्या काही काळापासून श्वसनाचा त्रास होत होत, असे कर्नाड यांच्या कुटुंबीयंच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
अंत्यसंस्कार साधेपणाने…
कर्नाड यांच्या पार्थिवावर कलापाली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने सांगण्यात आले. कर्नाड यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करणे आणि अंत्यसंस्काराच्यावेळी कोणतेही शासकीय रिवाज न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. कर्नाड यांच्या चाहत्यांनीही हा अंत्यसंस्कार विधी साधेपणाने आणि खासगीपणाने करण्यासाठी सहकार्याचे आवाहन कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले.
गिरीश कर्नाड तब्बल 5 दशके भारतीय नाटक, सिनेमा, मालिका आणि लेखनाच्या कार्यात सक्रिय असलेले ज्येष्ठ रंगकर्मी होते. कर्नाड यांनी कला क्षेत्रामध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री आणि पद्मभुषण पुरस्कारांनी गौरवण्यात अले होते. याशिवाय संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, कालीदास सन्मान, एकूण पाच फिल्मफेअर पुरस्कार, दहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अन्य असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले होते.आधुनिक काळात सर्वोत्तम साहित्यकृतींची निर्मिती कर्नाड यांनी केली होती. त्यांनी लिहीलेल्या नाटकांमध्ये “यायाती’, “तुघलक’ आणि “नागा-मानदाला’ यासारख्या नाटकांचा समावेश आहे. कन्नड भाषेतील या साहित्यकृतींचा इंग्रजीमध्ये आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.
कर्नाड यांनी नाट्यलेखनाबरोबरच हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांमध्ये “संस्कार’, “निशांत’, “मंथन’ यासारख्या समांतर चित्रपटांबरोबरच “टायगर जिंदा है’, “सपने’ आणि “शिवाय’ यासारख्या अन्य व्यवसायिक चित्रपटांचाही समावेश आहे. “उंबरठा’ या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरली होती.
कर्नाड यांनी दूरदर्शनवरील काही मालिकांमधूनही अभिनय केला होता. विज्ञानविषयक कार्यक्रमाचे निवेदन आणि सादरीकरणही त्यांनी केले होते. कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महाराष्ट्राशी नाते, पाश्चात्य प्रभाव…
गिरीश कर्नाड यांचा जन्म 1938 साली महाराष्ट्रात झाला. मात्र नंतर त्यांचे कुटुंबीय कर्नाटकात स्थलांतरित झाले. तेथेच त्यांच्यातील कलाकार आणि लेखक बहरला. इंग्लंडला जाऊन फिलॉसॉफी, राजकारण आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास कर्नाड यांनी केला होत. फिलॉसॉफीत त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयातही नैपुण्य प्राप्त केले. त्यामुळेच कर्नाड यांच्या लेखनावर पाश्चात्य साहित्यकृतींच्या पुनरुज्जीवनाचा ठसा होता. साहित्य चळवळीबरोबरच पुरोगामी चळवळीतही कर्नाड अग्रस्थानी राहिले होते. कर्नाड यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे वादही निर्माण झाला होता. अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांच्यावर त्यांनी टीका केल्याने आणि टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.