मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे लखनऊ येथे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते, तुम्ही माझ्यावर जावई नाही तर मुलासारखे प्रेम केले देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’ आशिष यांच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.
रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका देखील आला होता. त्यानंतर मिथिलेश हे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लखनऊ येथे शिफ्ट झाले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिथिलेश चतुर्वेदी यांनी ‘भाई भाई’ या चित्रपटामधून पदार्पण केलं. त्यानंतर सत्या, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, बंटी और बबली, कृष, रेडी, गदर: एक प्रेम कथा, कोई मिल गया आणि गांधी माय फादर यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी कोई मिल गया आणि क्रेजी 4 या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.
मिथिलेश चतुर्वेदी यांनी मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले होते. पटियाला बेब्स या मालिकेमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच गुलाबो-सिताबों या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.