देवीप्रसाद अय्यंगार
राजकारणाचे कंगोरे जसे बदलले तसे कार्यकर्त्यांतही बदल झाल्याचं जाणवतय. तीस पस्तीस वर्षांपूर्वीच राजकारण आजच्या पेक्षा कितीतरी पटीनं मुल्याधिष्ठीत होते.तसे कार्यकर्तेही आपल्या नेत्याच्या भक्कम पाठीशी उभे रहात होते. जोपर्यंत नेत्याची बाजू बरोबर असेल तो पर्यंत नेत्याची पाठराखण करणं ते आपलं कर्तव्य समजायचे किंबहुना एखाद्या नेत्याची निवडणुकच कार्यकर्त्यांनी हातात घेवून लढाई लढल्याचे चित्रही पहायला मिळायचं.
याच एक उदाहरण म्हणजे बबनराव ढाकणे यांची पहिली निवडणूक 1978 सालच्या या निवडणुकीसाठी त्यांनी आपली झोळी पसरून वोट भी दो, नोट भी दो असे म्हणत निवडणुकीसाठी निधीही गोळा केला होता.आणि कार्यकर्त्यांनी तो त्यांना दिलाही होता. शिवाय या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
यापूर्वीची आणखी एक निवडणूक आठवते ती म्हणजे अकोले तालुक्यातील कॉ. देशमुख आणि यशवंत भांगरे यांच्यातील लढतीत कॉ. देशमुख यांचे कार्यकर्ते राजूरला प्रचारासाठी फिरत होते त्यावेळी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर परतत असतांना या कार्यकर्त्यांची यशवंतराव भांगरेशी गाठ पडली तेव्हा भांगरेंनी या कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, त्यांच्या जेवणाची सोय केली. आपली वैचारीक लढाई असल्याचे सांगितले तेव्हा कम्युनिस्ट कार्यकर्तेही ओशाळले.
अशीच एक गोष्ट म्हणजे आणीबाणी नंतरच्या पहिल्याच निवडणुकीत डॉ. कुमार सप्तर्षींच्या विरोधात कॉंग्रेसचे डॉ. पाउलबुद्धे उभे असतांना सप्तर्षीच्या मागे कार्यकर्त्यांचा मोठा ताफा दिसायचा तर डॉ. पाउलबुद्धेंच्या बरोबर मोजून 4-5 कार्यकर्ते दिसायचे.डॉ. सप्तर्षींच्या सभा प्रचंड मोठ्या व्हायच्या. तर पाउलबुद्धेंच्या सभांना नगण्य गर्दी असायची मात्र प्रत्यक्ष निवणुकीच्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर डॉ.सप्तर्षीच्या आणि डॉ. पाउलबुद्धेच्या मतात केवळ 358 मतांचा फरक होता. हा काळ निवडणुका फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूका लढविण्याचा काळ होता.
या कार्यकर्त्यांचा त्यागही मोठा असायचा एखादे शेव-मुरमुऱ्याचे पोतेही कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी पुरेसे असायचे. आज मात्र परीस्थिती बदलली आहे. कार्यकर्त्यांची जागा आता समर्थकांनी घेतली आहे. व्यक्ती भोवती फिरणाऱ्या राजकारणाचा तो एक भाग बनला आहे. आता कार्यकर्त्यांचा पत्ताच नसतो.एखादी सभा म्हटल की समर्थक गर्दी झाली ली नाही ते नेत्याला कळवतो, गर्दी जमली की नेते येणार. पूर्वी असे नसायचे कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच नेते वावरायचे आणि समोर चार श्रोते असलेतरी सभामात्र लाखोंची असल्याचा अविर्भाव असायचा. शिवाय आजच्या समर्थकांना खूश ठेवण्यासाठी नेत्यांना कायकाय करावे लागते हे वेगऴे सांगायला नको.