कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि होणारे मृत्यू टाळण्यासाठी ग्रामसमिती आणि प्रभाग समिती पुन्हा एकदा सक्रिय कराव्यात. इली आणि सारीच्या रूग्णांविषयी कळविण्याबाबत तसेच ॲन्टीजेन टेस्ट करण्यासाठी सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना पत्र पाठवावे, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, इचलकरंजी, हातकणंगले, करवीर या ठिकाणी रूग्णांची संख्या वाढत आहे. याचे काय कारण तपासावे. पुन्हा एकदा ग्रामसमित्या आणि प्रभाग समित्या सक्रिय करा. यापूर्वी कडकडीत लॉकडाऊनमध्ये प्रभाग समिती आणि ग्रामसमितीने खूप कष्ट घेतल्याने रूग्ण संख्या कमी होती. सद्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. आता यामध्ये आपल्या सर्वांना जबाबदारीने रूग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गावागावातील यंत्रणा सक्षम करून मृत्यू होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
गृह विलगीकरणाबाबत फलक लावा : जिल्हाधिकारी श्री. देसाई
प्रतिबंधात्मक क्षेत्रात अशा सेविकांमार्फत सर्वेक्षण व्हायला हवं. त्याचबरोबर या क्षेत्रात कडक अंमलबजावणी व्हायला हवी. प्रभागसमिती, ग्रामसमिती यांनी प्रभावीपणे काम करावे असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, रूग्णसंख्या वाढत असल्याने तेवढेच सतर्क राहून कडक अंमलबजावणी करा. गृह विलगीकरणात असणाऱ्या रूग्णांबाबत घराबाहेर ठळकपणे फलक लावावेत. त्यांची दैनंदिन नोंद घेण्यात यावी. त्याचबरोबर त्यांची तपासणी होते का यावरही नियंत्रण ठेवा.
ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपून प्रशासक आहेत त्या ठिकाणी ग्रामसमित्यांची पुन:रचना करा. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला ग्रामसमितीचा अध्यक्ष करा. त्याबाबत तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी संयुक्त आदेश द्यावेत. कोव्हिड काळजी केंद्रात साधन-सामुग्रीची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्या. मृत्यू रोखण्यासाठी दक्ष राहावे. पॉझीटिव्ह रूग्णांशी बोलून दैनंदिन तपासणीबाबत माहिती घ्यावी.
सर्वेक्षण झालेल्या व्याधीग्रस्त नागरिकांची यादी पाठवण्यात आली आहे यातील एकालाही जरा जरी लक्षणं दिसले तरी स्वॅब घेवून तपासणी करावी.सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 100 बेडचे अद्यावत केंद्र सुरू होईल याबाबत सहाय्यक निबंधकावर जबाबदारी द्यावी. केंद्र आठवडाभरात पूर्ण होईल याबाबत पाठपुरावा करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
ईली आणि सारीचे रूग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडे देणे बंधनकारक आहे त्याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना पत्र द्यावेत. त्याचबरोबर उपचारासाठी दाखल असणाऱ्या रूग्णांची माहिती दररोज 11 वा. द्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनीही यावेळी मार्गदर्शन करून पोर्टल अपडेट करण्याबाबत सूचना दिल्या.