नगर – शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. सध्या शहरामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. मनपा घनकचरा विभाग व कचरा संकलन ठेकेदाराने संयुक्तपणे नियोजन करून शहरातील कचऱ्याचे ढीग येत्या आठ दिवसांत उचलावे. त्यानंतर जर कचऱ्याचे ढीग दिसल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला.
उपमहापौर भोसले यांनी मंगळवारी महापालिकेत घनकचरा विभागाची बैठक घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक गणेश कवडे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे, स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख उपस्थित होते.
घंटागाडीचे नियोजन करून घरोघरी वेळेवर जाणे गरजेचे आहे जेणेकरून शहरातील शंभर टक्के कचरा संकलन होईल.
शहराने स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतला आहे. जे कोणी नागरिक साफसफाई केल्यानंतर रस्त्यावर कचरा आणून टाकतील त्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्या ठिकाणचे फोटो काढून मी स्वतः पाठवीन व त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मुकादम व स्वच्छता निरीक्षक यांना कचऱ्याच्या ढीगाची माहिती असल्यामुळे त्यांनी ती यादी कचरा ठेकेदाराकडे द्यावी.
सर्वांनी जबाबदारीने काम केल्यास कचऱ्याचे ढीग पडणार नाहीत, असे उपमहापौर भोसले यांनी सांगितले. दरम्यान, शहरात कचरा गोळा करणाऱ्या वाहनांकडून कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा दिसतोच. बऱ्याचदा तर नागरिक सुद्धा कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील कचरा कुठेही टाकू नये, असे सांगण्यात येत आहे.