बाबासाहेब वाकळे ः उद्यान विभागाची बैठक
नगर – उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामकाज आढावा बैठक महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृह नेतेस्वप्नील शिंदे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपायुक्त सुनिल पवार, नगरसेवक संपत बारस्कर, मीनाताई चव्हाण,सुरज शेळके, उद्यान अधीक्षक किसन गोयल, उद्धव म्हसे, शशिकांत नजान व उद्यान विभागातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब वाकळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे कामकाजाबाबत आढावा घेतला. बैठकीस गैरहजर असणाऱ्यांना नोटीस काढणे बाबत सूचना दिल्या. छोटे छोटे असणारे उद्यान त्या ठिकाणी दोन ते तीन उद्यानासाठी एक कर्मचाऱ्याची नेमणुक करणे व त्यांच्याकडे संपूर्ण बागेची जबाबदारी सोपविणे. उद्यानामध्ये सिद्धीबाग, महालक्ष्मी उद्यान या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उद्यानाची रोजच्या रोज साफ सफाई, झाडांना पाणी देणे आदी कामे रोजच्या रोज करणे. शहरातील सर्व उद्यानामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपणावर सोपविलेली जबाबदार पार पाडणे. पदाधिकारी अधिकारी कोणत्याही उद्यानास अचानकपणे भेट देणार आहोत याबाबत काही त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
अतिरिक्त असणाऱ्या कर्मचाऱ्याची इतर विभागात बदली करणे. महालक्ष्मी उद्यानात काही खेळण्या बसविण्यात आलेल्या आहेत त्याबाबत त्यांचे दराबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करा. कमी दर निश्चीत करून संबंधित खेळणीधारक यांना त्याप्रमाणे आकारणी करणे बाबत सूचना देण्यात आल्या. महालक्ष्मी उद्यानातील अंतर्गत लाईट काही ठिकाणी बंद आहेत त्या तातडीने सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. पावसाळा सुरू होणार असल्याने 10 ते 15 फूट उंचीचे झाडे मागविण्याबाबत कार्यवाही करावी. मनपामार्फत लावण्यात आलेली झाडे जगविण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या की, शहर व उपनगरातील स्ट्रीट लाईट जवळ असणा-या झाडांच्या फांद्या काढणे बाबत तत्काळ कार्यवाही करावी. उद्यानात असणारा कचरा न जाळता कचराकुंडीमध्ये टाकण्यात यावा. शहरातील सिद्धीबाग उद्यान येथे बंद असलेल्या स्ट्रीट लाईट चालू करून घेण्याची कार्यवाही करावी. यावेळी सभागृह नेते स्वप्नील शिंदे यांनी सांगितले की, पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त झाडे मनपाच्या ओपन स्पेसमध्ये 6 ते 7 फूट उंचीचे झाडे लावण्यात यावे. लावलेली सर्व झाडे जगविण्यात यावी. उद्यानामध्ये येणारे नागरिक यांनी सुचना दिल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.