नगर -खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची टंचाई जाणवू नये, यासाठी पूर्ण नियोजन केले असून, सर्व घटकांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. याशिवाय, घरगुती बियाणांचा वापर करण्यापूर्वी त्यांची उगवणक्षमता तपासण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निविष्ठांचा काळाबाजार करण्याचे प्रकार घडले, तर अशा दुकानदारांसह कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
ना. भुसे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन समिती सभागृहात जिल्ह्याच्या खरीप हंगाम तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप उपस्थित होते.
ना. भुसे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही. त्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. शेतकऱ्यांना पीकविमा आणि हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ कसा मिळेल, यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्व. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना राबविण्यात येणार आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी, अशी साखळी निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. याशिवाय, विषमुक्त भाजीपाला मिळावा, यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. आगामी काळात नागरिकांकडून सेंद्रिय शेतमालाची मागणी वाढत जाणार आहे.
शेतकऱ्यांना या बदलाची माहिती कृषी विभागाने करून दिली पाहिजे. याशिवाय, कृषी शास्त्रज्ञ आणि शेती तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रतवारीनुसार अधिकाधिक उत्पन्न मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. सध्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अटीमुळे काही शेतकरी त्यापासून वंचित राहतात. त्या त्या ठिकाणी होणाऱ्या पावसाची नोंदही तपासली जाते. मात्र, त्यात अधिक परिपूर्णता कशी येईल, यासाठी कृषी विभाग अभ्यास करत आहे. प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या जिल्ह्यात तशी सुरुवात करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. राज्याने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेचा सर्वाधिक लाभ नगर जिल्ह्याला मिळाला.
जिल्ह्यातील दोन लाख 39 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना एक हजार 465 कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. याशिवाय, उर्वरित 47 हजार शेतकऱ्यांची 380 कोटी रुपयांची कर्जमुक्तीही करोना संकटानंतर लगेच होणार आहे. या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासंदर्भातील हमी राज्य शासनाने स्वीकारली आहे. मात्र, येथील राष्ट्रीयीकृत बॅंकांची खरीप पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अत्यल्प आहे. येत्या 15 जूनपर्यंत अधिकाधिक कर्जवाटप करा आणि या कामाला गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व बॅंकांना दिल्या. कृषी उपसंचालक विकास नलगे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी आभार मानले.