नवी दिल्ली – पश्चिम बंगाल निवडणुकीवेळी करोनाविषयक नियमांच्या उल्लंघनाच्या घटना घडल्या. त्याबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आणि स्टार प्रचारकांवर कारवाई केली जावी, अशा मागणीची याचिका मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
बंगालमधील प्रचारावेळी मास्कविषयीच्या नियमांचे पालन झाले नाही. निष्काळजी प्रचारामुळे बंगालमधील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रचारात सहभागी नेत्यांच्या संपर्कातील अनेकांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतरही ते नेते होम क्वारंटाईनमध्ये गेले नाहीत. निवडणूक आयोगाने करोना संकटकाळात झालेल्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यात आयोगालाच अपयश आले, असे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.
करोनाविषयक नियमांच्या उल्लंघनाबद्दल राजकीय नेते आणि स्टार प्रचारकांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि दंड ठोठावण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा. बंगालमध्ये मागील आठवड्यात प्रचार करणाऱ्यांना होम क्वारंटाईन करावे, अशा मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. ती याचिका दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी पोलीसप्रमुख विक्रम सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.