राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ः 36 लाख 72 हजाराचा दंड वसूल
मुंबई : स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्यक असले तरी स्कूल बस चालकच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे.
राज्य सरकारने मुंबईसह राज्यात रिक्षा, व्हॅन, टॅक्सी आदी वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या सुमारे 17 हजार 531 स्कुल बस चालकांसह 833 दोषी वाहनांविरोधात कारवाई करून तब्बल 37 लाख 72 हजार रुपयाचा दंड वसूल केल्याची माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली.
राज्यातील विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून बेकायदा वाहतूक करण्यात येत असून या वाहतुकीमुळे अनेक अपघात देखील घडले आहेत. याप्रकरणी पीटीए युनायटेड फोरममने जनहित याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
यावेळी राज्य सरकारच्या वतीने 7 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत केलेल्या कारवाईचा तपशिल न्यायालयात सादर केला. न्यायालयाने याची दखल घेत राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब ठेवली.