पुणे – दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती असल्याने जानेवारीपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 66 टक्के दुचाकीचालक हेल्मेट वापरत असल्याचे समोर आले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील हेल्मेट कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वाराची संख्या 20 टक्के घटली असून आता केवळ 46 टक्केच दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याचे “परिसर’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
एका बाजूला देशात होणाऱ्या अपघातांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून त्यातही सर्वाधिक 55 टक्के अपघात दुचाकींचे आहेत. त्यामुळे हेल्मेटचा वापर घटणे गंभीर बाब असल्याचे या सर्वेक्षणाच्या निकषांमध्ये म्हटले आहे. “परिसर’चे संदीप गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
“परिसर’संस्थेने मे 2018 मध्ये शहरातील हेल्मेट वापराचे सर्वेक्षण केले होते. त्यात 28 टक्केच दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याचे समोर आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी नवीन वर्षात हेल्मेट सक्तीचे संकेत डिसेंबर 2018 मध्ये दिल्याने संस्थेने पुन्हा एकदा सर्वेक्षण केले. त्यावेळी पोलीस कारवाई सुरू होण्याच्या भीतीने हेल्मेट वापरणाऱ्यांचा आकडा 4 वाढून तो 32 टक्के झाला. तर, जानेवारीत हेल्मेट सक्ती करत दोन आठवडे प्रत्यक्ष रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी “परिसर’ संस्थेच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात जानेवारीत हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या थेट 66 टक्के झाली. या कारवाईस डॉक्टर, वाहतूक तसेच अपघातविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही पाठिंबा दिला. मात्र, त्यावेळी पोलीस कारवाईवर स्वयंसेवी संस्था तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून आक्षेप घेण्यात आले. तसेच ही कारवाई थांबवण्याची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी ती मान्य करत, पोलिसांनी रस्त्यावर कारवाई न करता सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर हेल्मेट वापर कमालीचा घटला आहे. त्यामुळे “परिसर’ संस्थेने डिसेंबर 2019 मध्ये पुन्हा सर्वेक्षण केले असता, त्यात 20 टक्के वापर घटल्याचे निदर्शनास आले आहे.
दहा प्रमुख चौकांमध्ये सर्वेक्षण
“परिसर’ संस्थेने शहरातील वर्दळीचे मुख्य रस्ते असलेल्या प्रमुख चौकांमध्ये हे सर्वेक्षण केले. त्यात राजाराम पूल, स्वारगेट चौक, नळस्टॉप चौक, महर्षि कर्वे पुतळा, जिल्हा परिषद चौक, दक्षिण कमान चौक, गोल्फ क्लब चौक, विमाननगर चौक, पुणे विद्यापीठ चौक आणि सिमला ऑफिस चौकात हे सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी 10 ते 11.30 आणि दुपारी 3 ते 4.30 या वेळेत पाच दिवस हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकूण 712 छायाचित्रे काढून त्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली.