नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील ७५ जिल्हे पूर्णत: लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या आदेशाचे पालन गांभीर्याने होताना दिसत नाही.त्यामुळे आता या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे कठोर निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.
देशातील विविध राज्यांमधील ७५ जिल्ह्यांमध्ये पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी बाहेरच्या नागरिकांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नागरिकांनी लॉकडाऊन गांभीर्य समजावे, असे म्हटले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत असे दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे कोरोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्याने घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केले आहे. एक ट्विट करुन त्यांनी हे आवाहन केलं आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लोक काही अत्यावश्यक काम असल्याशिवायही बाहेर पडल्याचं दिसलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही असं चित्र दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन लॉकडाउन गांभीर्याने घ्या असं आवाहन पुन्हा एकदा केले आहे. स्वयंशिस्त महत्वाची आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी हे आपल्याला करायचे आहे असेही मोदींनी म्हटले आहे.