प्रत्येक गुंतवणूकदार सातत्यपूर्ण, स्थिर परतावा व कमीतकमी जोखिम, कमी अस्थिरतेसह मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
१) भारतीय गुंतवणूकदार अर्थविश्वातील घडामोडींमध्ये कितपत रस घेतात व त्याबाबत माहिती घेण्याची त्यांची कितपत तयारी आहे याचा गोषवारा पुढीलप्रमाणे.
* २३ टक्के लोकांना याबाबतची कुठलीही माहिती नाही. शेअर बाजार तसेच गुंतवणुकीच्या आर्थिक पर्यायातील विविधतेची माहिती नाही.
* ४९ टक्के लोकांना थोडीफार गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत ज्ञान आहे व येणाऱ्या नवनवीन पर्यायाबाबत माहिती घेण्याची तयारी आहे.
* २१ टक्के लोकांना शेअर बाजार व अर्थविश्वाची व्यवस्थित माहिती आहे व ते स्वत:ला नेहमीच याबाबतच्या ज्ञानाबाबत अद्ययावत करत असतात.
* ८ टक्के व्यक्ती शेअरबाजार व अर्थविश्वाबाबत सखोल ज्ञान आहे आणि वेळोवेळी याबाबत अद्ययावत माहिती आत्मसात करत असतात.
( महत्त्वाचा निष्कर्ष – ७० टक्के भारतीय खूप कमी किंवा आर्थिक विश्वाबाबत जवळपास माहिती नसलेले आहेत. भारताच्या पश्चिमेकडे राहणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या नागरिकास अर्थविश्वाबाबत माहिती असते. परंतू पूर्वेकडील भारतात राहणाऱ्या लोकांमध्ये केवळ १८ टक्के नागरिक याबाबत जागरूक आहेत.)
२) गुंतवणूक करताना आर्थिक जोखिम घेण्याची किती भारतीयांची तयारी आहे हे पुढीलप्रमाणे निदर्शनास आले आहे.
* ५७ टक्के भारतीय गुंतवणूकदार गुंतवणुकीमध्ये कोणताही जोखिम घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे गुंतवणूक करत असताना अनेक पर्यायांचा वापर केला जातो.
* ३८ टक्के भारतीय एकाच पर्यायामध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे मानतात.
* ६ टक्के भारतीयांना या बाबतचे कोणतेही ज्ञाननाही.
निष्कर्ष – बहुतांश भारतीयांना अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित वाटते.
३) चुकीच्या गुंतवणूक पर्यायांमधून बाहेर पडण्याची निर्णय घेण्याची क्षमता पुढीलप्रमाणे –
* ३८ टक्के गुंतवणूकदार एक वर्षापर्यंत गुंतवणूक करून वाट पाहतात आणि नंतर बाहेर पडतात.
* ३३ टक्के गुंतवणूकदार सहा महिन्यात गुंतवणुकीतून बाहेर पडतात.
* १८ टक्के गुंतवणूकदार तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करतात आणि मगच गुंतवणुकीतून बाहेर पडण्यासंदर्भातील निर्णय घेतात.
* १० टक्के गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून बाहेर पडण्यासाठी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी चालतो.
निष्कर्ष – १० पैकी ७ गुंतवणूकदार एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असतात व सातत्याने गुंतवणुकीचे पर्याय बदलत असतात.
४) गुंतवणुकीतील परताव्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात
* ३३ टक्के गुंतवणूकदार मुद्दल कायम राहण्यास प्राधान्य देतात. गुंतवणुकीवरील परतावा कमी मिळाला तरी चालेल अशी त्यांची भूमिका असते.
* ४३ टक्के गुंतवणूकदार अस्थिरतेपेक्षा स्थिर स्वरुपाच्या परताव्यास प्राधान्य देतात.
* १७ टक्के गुंतवणूकदार गुंतवणुकीमध्ये थोडी अस्थिरता मान्य करण्याच्या भूमिकेत असतात व जादा परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
* ८ टक्के भारतीय गुंतवणूकदार जादा परतावा कमावण्यासाठी गुंतवणुकीतील अस्थिरता मान्य करतात.
निष्कर्ष – पूर्वेकडील गुंतवणूकदारांपैकी प्रत्येक दुसरा गुंतवणूकदार स्थिर परताव्यास प्राधान्य देतो. किंबहुना एक तृतीयांश गुंतवणूकदार परताव्यापेक्षा गुंतवणुकीतील मुद्दलाला प्राधान्य देतात.