नवी दिल्ली: “पीएम केअर्स’निधीतून स्थलांतरित मजुरांसाठी किती पैसे खर्च केले गेले, याची माहिती द्यावी असे कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकजण मरण पावले आहेत. काही जण पायी प्रवास करताना मरण पावले. काही प्रवासादरम्यान मरण पावले. काही उपासमारीमुळे मरण पावले. त्यांच्यासाठी आर्थिक मदत म्हणून “पीएम-केअर्स’ निधीतून किती पैसे खर्च झाले, याची माहिती पंतप्रधानांनी द्यावी, असे कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
आपत्तीमध्ये मरण पावलेल्या व्यक्तींना, त्यांच्या नातेवाईकांना, पत्नी, मुले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सरकारने आर्थिक मदत करावी, असे आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 12 मध्ये म्हटले आहे. अशा व्यक्तींना सरकारने किती आर्थिक मदत केली हे स्पष्ट करावे, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.
सरकारने गेल्या 6 वर्षांपासून राबवलेला अजेंडा आता बाजूला ठेवावा आणि गरिबांच्या हिताच्या धोरणांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करावे. आगामी काळात देशाचे अर्थकारण खूपच नकारात्मक स्थितीतून जाणार आहे. असे आरबीआयनेही म्हटलेले आहे. देशात 45 कोटी मजूर आहेत. त्यांचे काय होणार. आपल्याला भविष्याचा विचार करावा लागेल. त्यामुळे गेल्या 6 वर्षांचा अजेंडा दूर ठेवावा आणि गरिबांच्या हिताचा विचार करावा, असे सिब्बल म्हणाले.