पुणे – नैर्ऋत्य मोसमी (मान्सून) पावसाचे दि.15 जून रोजी कोकणात आगमन झाले. मात्र, सात दिवस झाले तरीही अद्याप मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात वादळी पावसाची शक्यता आणि प्रमाण कमी राहणार आहे. दि.26 तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि नंतर पावसाच्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा. वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.