हडपसर(प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या सावटामुळे सलग दुसऱ्यांदा पालखी सोहळा एस. टी. बसने देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत नेण्याचा प्रशासन आणि पालखी सोहळाप्रमुखांसह वारकऱ्यांसह सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी सांप्रदयामध्ये थोडीसी नाराजी असली तरी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सोहळ्यात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. पालखी सोहळा देहू आणि आळंदीमध्ये असला तरी वारकऱ्यांची भक्ती तसूभरही कमी झाली नाही, असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी सांगितले.
देहू-आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर पुण्यातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन एकादशीला हडपसरमध्ये विसावा घेतात. ही भावना ठेवून हडपसरमध्ये आज (सोमवार, दि. 5 जुलै) एकादशीला ज्ञानोबामाऊली तुकारामांसह विठ्ठल नामाचा जयघोष, टाळमृदंगाचा नाद, त्या तालावर पावलांनी धरलेला ठेका अशा भक्तीमय वातावरणात दोन्ही पालख्यांचे प्रतिकात्मक स्वागत करण्यात आले.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांच्या हस्ते दोन्हीही संतांच्या पालखी विसावा स्थळावर ग्रंथपूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी पालिकेचे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, नगरसेवक मारुती तुपे, नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेविका उज्ज्वला जंगले, योगेश ससाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख,माजी उपमहापौर निलेश मगर, हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, स्वीकृत सदस्या संजीवनी जाधव, माजी नगरसेवक सुनिल बनकर ,पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे, गोपीनाथ पवार, योगेश गोंधळे, बच्चूसिंग टाक, सागर भोसले, राजू महाडिक, कमलेश कासट उपस्थित होते.
यावेळी गाडीतळ येथे सासवड रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज तर सोलापूर रस्त्यावरील संत तुकाराम महाराज पालखी विसाव्यावर स्थानिक भाविकांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. सडा रांगोळी व धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करण्यात आले होते. भजनी मंडळाने विविध प्रकारचे अभंग गायन केले. याच तालावर उपस्थित महिला व पुरूषांनी फुगडी घातली. फेर धरून वातावरण अधिकच भक्तीमय केले. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीही गळ्यात टाळ घेऊन वारीचा आनंद अनुभवला.