भाजीपाला विकून गावी परतत असताना पिकअपला अपघात
पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील करंदी येथील चार तरुण मुंबई येथे भाजीपाला विक्री करण्यासाठी गेले होते. ते तेथून परतत असताना आज पहाटे जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंदजवळील दांगट मळ्याजवळील झालेल्या अपघातात या चारही तरुणांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, करंदी येथील सुरेश नारायण करंदीकर (उघडे), सिद्धार्थ राजेश करंदीकर (उघडे), आकाश सुरेश रोकडे, सुनील विलास उघडे हे तरुण शेतकरी 27 ऑगस्ट रोजी छोटा हत्ती टेम्पो (क्र. एमएच- 16 सी- 6388) या वाहनाने मुंबई येथे भाजीपाला घेऊन गेलेले होते.
भाजीपाला विक्री करून आज पहाटे परतत असताना आळेफाटा जवळील वडगाव आनंद येथे या तरुणांच्या वाहनाला ठाण्याकडे जाणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच- 16 एई- 9080) जोराची धडक दिली. त्यात दोन शेतकरी जागीच ठार झाले, तर इतर दोघांना आळेफाटा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. वाय. मुजावर यांनी दिली. या अपघातात तरुणांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.