कानपूर – उत्तर प्रदेशातील एका १३ वर्षीय अल्पवयीन सामूहिक बलात्कार पीडितेच्या वडिलांचे अपघाती निधन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार या पित्याने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांत दाखल केली होती. यानंतर ते आपल्या पीडित मुलीला तपासणीसाठी रुग्णालयामध्ये घेऊन गेले असता रुग्णालय परिसरातील रस्त्यावरच त्यांचे अपघाती निधन झाले. पीडितेच्या वडिलांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या दिपू यादव व सौरभ यादव यांचे वडील उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी गोलू यादव याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देताना, ‘आरोपी आम्हाला तक्रार दाखल केल्यापासूनच धमक्या देत होते. पोलिसांची भूमिका देखील आरोपींना पाठीशी घालणारीच आहे.’ असा गंभीर आरोप लगावला.
याबाबत आज सामूहिक बलात्कार पीडितेच्या आजोबांनी पत्रकारांशी संवाद साधताना, ‘माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे… पोलिसही आरोपींना मदत करतायेत’ असा गंभीर आरोप लगावला. तर कुटुंबातील एका सदस्याने, आरोपींनी ‘आपले वडील पोलिसांमध्ये असल्याचं सांगत जपून रहा’ अशी धमकी दिल्याचं सांगितलं.
पीडितेच्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर आता कानपूरचे जिल्हाधिकारी अलोक तिवारी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केलाय. यामध्ये त्यांनी, दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरु असल्याचं सांगितलं. तसेच पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली. दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी म्हणाले.
दरम्यान, पीडितेच्या वडिलांच्या अपघाताविषयी माहिती देताना कानपूर पोलीस प्रमुख प्रीतिंदर सिंह यांनी, पिडीतेची वैद्यकीय चाचणी सुरु असताना तिचे वडील रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर चहा पिण्यासाठी गेले होते, तेथे त्यांना एका ट्रकने उडवले. अपघातानंतर त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत आम्ही अपघाती निधनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तत्पूर्वी, उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. यामध्ये मुलीची छेड काढल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर आरोपीला अटकही करण्यात आली होती. मात्र आरोपी जामिनावर सुटला असता त्याने पीडितेच्या वडिलांचा निर्घृण खून केला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली होती.