राजापूर – कोकणातील नाणार रिफायनरी विरोधात सातत्याने लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांचे मंगळवारी सकाळी उपघाती निधन झाले. सोमवारी सायंकाळी येथे थार आणि दुचाकी यांच्यात धडक झाल्याने वारिसे गंभीर जखमी झाले होते. पुढील उपचारांसाठी कोल्हापुरात नेल्यानंतर त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली.
मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला असून नाणारसंदर्भात लिहिले असल्याने त्यांचा घातपात घडला असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंधर्भात पत्र लिहिणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
ठाकरे गटाचे खा. राऊत म्हणाले की, वारिसे या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थक होते, त्यामुळे या मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना याबाबत पत्र पाठवून चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? –
सोमवारी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार वारिसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीचे कात्रण पाठवले होते. मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाची ती बातमी होती. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनरसंदर्भातील ही बातमी होती.
यानंतर दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत वारिसे गंभीर जखमी झाले. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.