मुुंबई – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर चिल्हार फाट्याजवळ अवाणढणी गावाजवळ आज झालेल्या भीषण अपघातात दांडी येथील चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
हेमंत तरे (वय 60), सुषमा आरेकर (32), चालक राकेश तमोरे (42) आणि सर्वज्ञा आरेकर (02) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय हर्षद तरे (27), भव्या आरेकर, महेश आरेकर, सुनील तामोरे, आकाश पाटील आणि जयेश तामोरे हे सहाजण गंभीर जखमी झाले असून तृप्ती तामोरे आणि रमेश आरेकर यांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबईकडून दांडी येथे परतताना प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूने धडक दिल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. एकवीरा मातेचे दर्शन घेऊन हे कुटुंब पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतत असताना हा अपघात घडला. वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते. यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती अतिगंभीर आहे.