गुवाहाटी – आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत बुधवारी दोन नावांमध्ये धडक झाली. त्या दुर्घटनेत 120 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी नाव नदीत उलटली. त्यामुळे अनेक प्रवासी बेपत्ता झाले. त्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले.
जोरहाट जिल्ह्यातील निमती घाटाजवळ मा कमला ही खासगी नाव आणि त्रिप्काई ही सरकारी नाव एकमेकांना धडकल्या. त्यामुळे खासगी नाव उलटून पाण्यात बुडाली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले.
त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांची पथकेही सहभागी झाली. त्या पथकांना 41 प्रवाशांना वाचवण्यात यश आले. बेपत्ता झालेल्या इतर प्रवाशांचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता. केंद्र सरकारच्या पातळीवरूनही त्या दुर्घटनेची तातडीने दखल घेण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वासर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून माहिती घेतली. शहा यांनी बचाव कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुर्घटनेच्या बातमीने व्यथित झाल्याचे म्हटले.