नांदुर – पुणे-सोलापुर महामार्गावर दौंड तालुक्यातील सहजपुर फाटा येथे आज सकाळी झालेल्या ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ईको कार यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भीषण होता की वाहने एकमेकांवर आदळल्याने इको कार आणि ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला. या अपघातासंदर्भात भाऊसाहेब रणजित चव्हाण (वय-२२ वर्ष, उसतोड कामगार, हल्ली रा.यवत अनुराज शुगर कारखान्या जवळ ता.दौंड जि.पुणे. मुळगाव- घोडेगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात यवत पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजता फिर्यादी उरूळी कांचन येथुन ऊस आणण्यासाठी निघाले असता ६.३० वाजता सहजपुर फाटामध्ये पाठीमागून येणाऱ्या टँकरने (एम एच ४३ वाय ७३९३) धडक दिल्याने ट्रक्टरचे तोंड डावीकडून उजवीकडे सहजपुर फाट्याच्या बाजूने फिरले. त्याचवेळी पुण्याकडून येणाऱ्या कंटेनरने (एम एच १२ एल टी ४१७८) ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरची चाके तुटून पडली.
धडक दिल्यानंतर कंटेनर ट्रक जागीच थांबल्याने पाठीमागुन येणाऱ्या टाटा टॅम्पोची (एम एच ०५ ए एम ३४०२) कंटेनरला धडक बसली. त्याच्या पाठीमागुन इको कारची (एम एच १२ केटी ६७८९) टॅम्पोला पाठीमागून धडक बसली. यामध्ये ईको कारला अज्ञात ट्रकने (नंबर माहीत नाही) धडक दिली. ट्रक आणि ईको कारला धडक दिल्यानंतर अज्ञात ट्रकने रिव्हर्स घेताना सरकारी वाहन महिंद्रा गाडीला (एम एच १२ एन यु ३५०८) समोर धडक दिली. त्यानंतर तो ट्रकचालक पळून गेला.
हा अपघात एवढा भीषण होता की ईको कारचा पूर्ण चक्काचूर झाला होता. गाडीचा पञा तोडुन अपघात ग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये ओमकार अण्णा गवळी (वय-३० वर्ष रा. रावणगाव ता.दौंड जि.पुणे), विरेंद्रसिह यादव (रा.कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे), हे जागीच मृत्यूमुखी पडले तर कैलास रामचंद्र भागवत हे गंभीर जखमी झाले. या अपघाता संदर्भात पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करत आहे.