नवी दिल्ली – केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत आज शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेची सातवी फेरी होत असतानाच त्यांनी ट्विटरवर ही मागणी केली आहे.
अत्यंत अवघड हवामान स्थिती असताना दिल्लीतील रस्त्यांवर उघडयावर गेले सुमारे चाळीस दिवस या शेतकऱ्यांनी जो लढा दिला त्याला आपण सलाम करतो. आता शेतकऱ्यांचा आणखी सयंम न पहाता सरकारने त्यांच्या मागण्यांचा स्वीकार करून त्यांचे आंदोलन समाप्त कसे होईल हे पाहावे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनला पहिल्यापासूनच समर्थन दिले असून दिल्लीतील धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्ली राज्य सरकारने अनेक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.